आठवणी फाउंटन पेनच्या




 जागतिकफाउंटन पेन दीनानिमित्त


 *आठवणी फाउंटन पेनच्या


दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक शाई पेन दिवस (फाउंटन पेन डे) साजरा केला जातो... आज ही मला फाउंटन पेन अर्थात शाईचा पेन हा माझा आवडता पेन आहे ... शाळा नि महाविद्यालयात  असताना नवीन शाईचा पेन घेणं हा माझा छंद होता ... आजही माझ्या संग्रही काही पेन आहेत ... 


औरंगाबादला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात    पदवियोत्तर पदवीच्या शिक्षणासाठी 1988 मध्ये आलो असता औरंगपुऱ्यातील अभय पेन सेंटर हे पेन खरेदीचं ठिकाण झालं ... नवीन पेन आला नि तो माझ्या बजेटमध्ये असला की मी तो पेन घेत असे ... 


पेनच्या निफ ,,वेगवेळ्या रंगाच्या शाईच्या दौत माझ्याकडे असतं ...प्रामुख्यानं निळी शाही तर असेच पण काळ्या , हिरव्या , जांभळ्या रंगाच्या दौत ,शाही भरण्यासाठी प्लास्टिक पंप, काही पेन मध्ये शाही भरण्याची व्यवस्था असे ... हल्ली रिफिल नि युज थ्रोच्या पेनमुळे शाही च्या फाउंटन पेनची क्रेज लयास गेली आहे... हाताला नि कपड्यांना शाही लागण्याच्या संकल्पनेतून फाउंटन पेनचं गायब झाल्या ... फाऊंटन पेनच्या खूप आठवणी आहेत ...त्यावर पुन्हा कधीतरी ...पण या पेनपर्यंतचा इतिहास ही खूप रंजक आहे ...तोही जाणून घेऊ या ...


प्रथम बोरू, पीस हे टोकदार करून शाईत बुडवून मानव लिहिता झाला...  दौतीत बोरू- पीस बुडवून लेखन करताना शाईचा प्रवाह कधी अपुरा तर कधी प्रमाणाबाहेर होत असे, तसेच शाई संपल्यावर लेखणी परत दौतीत बुडवावीच लागे...  पर्यायानं लेखनात खंड पडे...  त्याकरिता कायम शाई बरोबर ठेवावी लागे...  ती द्रवरूप असल्यानं एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना सांडण्याची भीती असे  ... अन असे घडतही असे ...  ही मोठीच गैरसोयीचे होती ... 

ही गैरसोय दूर करण्याचे मग प्रयत्न सुरू झाले ... शाईची बाटली बरोबर बाळगण्या ऐवजी ती पेन मध्येच साठवून ठेवता आली तर...? या प्रयत्नांना यश आलं नि 1850 पासून असे पेन बाजारात आले... 


अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते... या निबमध्ये मधोमध एक भेग असते आणि त्याच्या मुळाशी एक भोक असतं ...  शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते...  कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते... पण हा शाईचा प्रवाह नियंत्रित नसल्याने कागदावर शाई जास्त प्रमाणात उतरत असे... शाईचा प्रवाह नियंत्रित व्हावा त्यासाठी निबकडून शाईच्या नळीकडे तीन अतिशय बारीक केशिका असतात... त्या नळीत आणि  बाहेरील हवेचा दाब (वातावरणीय) समान असल्यामुळं हवा आत गेल्या शिवाय शाई बाहेर येणे शक्य नसतं ... 


त्याकरिता निबवर असलेल्या छिद्राकडून एक केशिका हवा टाकी पर्यंत घेऊन जाते आणि  हवा विरुद्ध दिशेने शाईला तीन केशिका मधून निबकडे ढकलते... तरी शाई अतिरिक्त येऊन लिखाण खराब होऊ शकते...  अशा वेळी अतिरिक्त शाई रोखून धरण्याकरिता निबच्या खाली प्लास्टिकचं कलेक्टर असतं...  केशिकामधून शाई येऊन कागदावर उतरण्यामागं केशाकर्षण हा सिद्धांत आहे...  केशाकर्षणामुळं एखाद्या बारीक व्यासाच्या नलिकेतून द्रव गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेस म्हणजे वर चढते...  


एकदा शाई कागदापर्यंत आली की संसंजनशील बलामुळे ती शाईच्या इतर रेणूंना आकर्षून घेते  आणि हा शाईचा प्रवाह अविरत चालू राहतो...  असे हे शाईचे पेन त्या काळी  अतिशय लोकप्रिय झाले... ही शाई प्लास्टिक कलेक्टर असूनही गळत असे ... ती टिपून घेण्याकरिता पुनश्च केशाकर्षण सिद्धांताचा वापर करीत टीप कागद बाजारात आले...  मात्र, शाईचा द्रावक पाणी असल्यानं ती वाळायला थोडा वेळ लागे...


शाईचा अखंड पुरवठा कसा करता येईल यासंबंधी प्रयत्न करण्यात आले ...  त्यातूनच फाउंटन पेनाचा शोध लागला... शाईचा पुरवठा सतत होणारी लेखणी तयार करावयाचे प्रयत्न फार पूर्वी पासून सुरू होते...  मध्ये बार्थोलोम्यू फॉश यांनी शाईचा साठा असणारी पण गुंतागुंतीची रचना असणारी एक लेखणी तयार केली... यापेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या लेखणीमध्ये जॉन शेफर यांनी तयार केली... त्याचवर्षी जे.एच. ल्यूईस यांनी शाईचा साठा असणारी क्किल लेखणी तयार केली...  या लेखणीलाच पहिलं फाउंटन असे म्हटले जातं ... आधुनिक पेनाचं हे पूर्वरूप होय ... 


                                  #यशवंतभंडारे , 

                                 औरंगाबाद 

                                 दि .4 नोव्हेंबर 2022 

संदर्भ : इंटरनेट  

फोटो : साभार -- गुगल


                         *****

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?