लोकशाही , समतेचे कट्टर पुरस्कर्ते .... महात्माबसवेश्वर

 लोकशाही , समतेचे  कट्टर पुरस्कर्ते  'महात्माबसवेश्वर '




महात्मा बसवेश्वर महाराज  हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक  होते... त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध आणि अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध बंड पुकारून त्या समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला... त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला... 


शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५  मध्ये अक्षय तृतीयला प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला... काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा...  त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते...   त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते...  त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या... बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव नागम्मा होते ... 


बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत...  त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून मुंज करून घ्यायचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले... कृष्णा आणि  मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते... तेथे बसवेश्वरांनी बारा वर्षे वास्तव्य केले... कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला... त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला... तेव्हा ते सोलापुरातील मंगळवेढा येथे आले... तेथे ते एकतीस वर्षे राहिले...


भारतीय लोकशाही संसदेची स्थापना : 

बसवण्णांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली...  या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्यात येतं असे ... बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हिताच्या गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली... त्यांना  बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते म्हणून ओळखले जाते... सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते...


एकूणच त्यांनी वचनसाहित्यात समता,मूल्य,न्याय,बंधूता,एकात्मता तसेच स्वातंत्र्य,अधिकार ,नियंत्रण आणि शिस्त,सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहे...सद्यस्थितीत शासन आणि प्रशासनात  या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता,हिंसा ,भेदभाव नि  जातीय राजकारण आदी .समस्याना पायबंद घातला जाऊ शकतो ...  परिणामतः चांगले सुशासन व्यवस्था निर्माण होऊ शकते...महात्मा  बसवेश्वर यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!!


                यशवंत कि.  भंडारे 

                 दि. 30 एप्रिल 2025

                  अक्षय तृतीया 


                                  *

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?